प्रतिनिधी , मुंबई : केंदीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेत हातसफाई करून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत टोळीला अखेर तीन दिवसांतच ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. या यात्रेला सोमवारी ठाण्यात सुरुवात झाली असताना तुफानी गर्दी झाल्याने सराईत पाकिटमारांची नाशिक – मालेगाव येथून आलेल्या टोळीने १० मोबाईल लांबवीले होते. तर १ लाख १९ हजाराची रोकडीवर हातसफाई केली. या घटनेने एकच खळबळ उडालेली होती. सदरच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने धडक कारवाई केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अचूक कारवाई करून चौकडीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोकडीसह मोबाईल असा ६ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल आणि एक चारचाकी कार हस्तगत केली आहे.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत एक आमदारांसह काही कार्यकर्तेचे खिसे कापले असल्याची घटना घडली होती. या यात्रेत पाकीटमारी झालेल्या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान हे सर्व आरोपी पनवेल रोडवरील कल्पवृक्ष हॉटेल जवळ असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या टीम ला मिळाली होती. त्यानंतर पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचून चार जणांना पकडण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्या अबूबकर उर अबू कबुतर मोहम्मद उस्मान अन्सारी(३५) रा. मालदा शिवार,मालेगाव, नाशिक, आरोपी नदीत अक्तर फैयाज अन्सारी (३०) रा. आयेशानगर, मालेगाव, नाशिक, आरोपी अतिक अहमद मोहम्मद स्वराती अन्सारी (५१) रा. रमजानपुरा, मालेगाव, नाशिक आणि आरोपी अशपाक अहमद अन्सारी(३८) रा. दत्तनगर, मालेगाव, नाशिक यांचा समावेश आहे. या आरोपींची अधिक चौकशीत केली असता जन यात्रेत नागरिकांचे खिसे कापल्याचे कबुली दिली.
राजकीय कार्यक्रमात पालकीटमारांची विशेष टीम सक्रिय
अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांची कार्यक्रम होत असतात यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते याचाच फायदा घेऊन अश्या टोळ्या सक्रिय होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. अश्या कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक मग्न असताना नकळत त्यांचे खिसे कापण्यात सराईत असलेल्या पाकीटमारांची टोळी येत असते.
नारायण राणे यांच्या यात्रेमधील लूट टळली
मुंबई, ठाण्यासारळ्या शहरात राजकीय पक्षांच्या नियोजित कार्यक्रमावर अश्या टोळीचा डोळा असतो. सोमवारी ठाण्यात झालेल्या यात्रेनंतर या टोळीने ठाण्यात मुक्काम केला होती, दरम्यान गुरुवारी मुंबईत होणाऱ्या केंदीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत हे सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, ठाण्याप्रमाणे मुंबईत ही खिसे कापण्यात येणार होते, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा कट उधळून लावण्यात आला आहे.
