प्रतिनिधी , मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या १० वर पोहचली आहे. त्यात डोंबिवलीत आणखी एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. आता मनसेची मागणी मान्य झाली.
“कल्याण-डोंबिवलीत बाधितांची संख्या वाढत असतानाच इथे कोरोना टेस्टिंग लॅब असणे आवश्यक आहे, अशी मागणी मी २९ मार्च रोजी केली होती. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ती मान्य केली असून जिल्हा नियोजन योजनेमार्फत या लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. त्यांचे व खासदार तसेच पालकमंत्र्यांचेही आभार.” असे ट्विट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले .
