प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा (Onion) निर्यात बंदी घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अनेक संघटनांनी याचा विरोध केला आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्यानं महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह भाजपातील (BJP) नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की,’केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोना काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.
तसेच कांद्याचं उत्पादन घेणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यानी केलं आहे. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा मुबलक पुरवठा त्यांनी केला. आज जगभरात कांद्याला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव गडगडतात तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो. पण आज कांद्याला योग्य भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी असं उदयनराजे म्हणाले आहेत.
