जनतेज न्युज

कोकणातील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने पाठविली जीवनावश्यक वस्तूंची मदत*

प्रतिनिधी , अतिवृष्टीमुळे कोकणाची पुरती वाताहत झाली आहे. कोकणी माणसांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे पाच ट्रक कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आले. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्रक्सला हिरवा झेंडा दाखविला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते.
कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी कोकणाला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना साह्य करण्याची संकल्पना गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यानुसार , शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रिटानिया बिस्किटांचे एक लाख पुडे, बिस्लेरी पाण्याच्या एक लाख बाटल्या, फिनेलच्या 4000 बाटल्या, 50 हजार मॅगीची पाकिटे, मेणबत्तीचे 2500 बाॅक्स, 6 हजार माचिसचे बाॅक्स तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून 800 बाॅक्स पाणी, 2500 बिस्किट पाकिटे, 100 किलो फरसाण, 50 बाॅक्स फिनेल, 1200 झाडू असे साहित्य पाच ट्रकमध्ये भरून कोकणाच्या दिशेने रवाना केले.
हे साहित्य थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ट्रक्ससोबत गेले आहेत.
यावेळी शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.