काळे फलक घेऊन केली सरकार प्रशासना विरोधात निदर्शने
प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली: मागील दोन वर्षांपासून कल्याण च्या पत्रिपुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे .पत्रिपुल प्रभागातील नागरिकांना देखील घर गाठण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. रस्त्यावर दिवसा रात्री वाहतूक कोंडी असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील व्यवसाय मागील 2 वर्षांपासून ठप्प असल्याने व्यापारी हवालदिल बनले असून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने भाजपा महिला जिल्हाध्यक्षा व नगरसेविका रेखा चौधरी यांनी केली आहे तर आज नागरिकांना होणारा त्रास दाखवून देण्यासाठी त्यांनी भाजप कार्यकर्ते व नागरिकांसमवेत काळे फलक हातात घेत निदर्शने केली यावेळी रेल्वे समांतर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची देखील मागणी केली. एकीकडे पत्रिपुल बंद असतानाच वालधुनी पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून कोपर पुलाचे काम देखील संथ गतीने सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिकांची चारही बाजूने प्रशासनाने कोंडी केली आहे. यामुळे नागरिकांना किती त्रास होतो हे दाखवून देण्यासाठी नागरिकांनी आज आंदोलन छेडले असून नागरिकांची कोंडीतून प्रशासनाने लवकरात लवकर सुटका केली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे
