जनतेज न्युज

टास्क फोर्सच्या अहवालानंतरच निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील: आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी :राज्यातील ज्या जिल्हयामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत असून हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपे यांनी सांगितलं आहे.टोपे यांच्या हस्ते आज जालन्यात १०० खाटाच्या कोविड रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या राज्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून राज्यात पूर्ण क्षमेतेने लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे मात्र केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्यानं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे.लसींचा केंद्राकडून चांगल्या प्रमाणात पुरवठा झाल्यास राज्यात ७० ते ८० टक्के लसीकरण पूर्ण होऊन निर्बंध कमी करण्यास मदत होईल असंही टोपे म्हणाले.

पूरग्रस्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या टीम पाठवण्यात आल्या असून साथीचे आजार पसरवू नये म्हणून प्रतिबंधक उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून खाजगी हॉस्पिटलमध्ये सीरियस रूग्णांसाठी 50 टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

फ्रंट लाईन वर्करमध्ये 35 टक्के लसीकरण झालं असून फ्रंट लाईन वर्कर्सनी सर्वात अगोदर लसीकरण करून घ्यावं जेणेकरून तिसऱ्या लाटेत या कर्मचाऱ्यांना आणखी काम करता येईल असं सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याची सूचना केली.