प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यातच जमा आहे. त्यातही JEE आणि NEET ची परीक्षा घेऊ नये, या मागणीसाठी देशातील सहा राज्यांनी प्रयत्न केलेत; मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत JEE आणि NEET या परीक्षा होणारच असे सांगितले आहे.
त्यामुळे परीक्षा होऊ नये यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करणा-या ठाकरे सरकारचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगड या सहा राज्यांनी या परीक्षा होऊ नये यासाठी ही याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने परीक्षा रोखण्यास नकार दिला आहे. या परीक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी ठाकरे सरकारने केली होती. १ ते ६ सप्टेंबर २०२० रोजी JEE परीक्षा होत आहे.
तर, NEET परीक्षा १३ सप्टेंबरला आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने १७ ऑगस्टला परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, देशात कोरोनाची स्थिती पाहता ही परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी काही राज्यांनी केली होती. मात्र कोरोनामुळे जीवन थांबू शकत नाही. ही परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होईल, असं सांगत न्यायालयाने परवानगी दिली होती. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सुनावणीदरम्यान कोर्टात, परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल, असा दावा केल्यानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. कोरोमुळे मे महिन्यात होणारी JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्यात आली, ती आता सप्टेंबरमध्ये होणार आहे.
