जनतेज न्युज

येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे

रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व पात्र ७१८८ लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव मंजूर !

प्रतिनिधी, बीड : रमाई घरकुल योजने अंतर्गत बीड जिल्ह्यातून प्राप्त ७९०० प्रस्तावांपैकी पात्र लाभार्थी असलेल्या ७१८८ प्रस्तावांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्याचे वार्षिक उद्दिष्ट ४००० असताना जवळपास दुप्पट प्रस्तावांना श्री. मुंडे यांनी मंजुरी दिली आहे.

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी याबाबत सांगितले की, जिल्ह्यातुन ३१ मार्च पूर्वी ७९०० प्रस्ताव घरकुल मंजुरीसाठी प्राप्त झाले होते. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास १ लाख २० हजार रुपये घर बांधण्यासाठी व १२ हजार शौचालयासाठी असे एकूण १ लाख ३२ हजार रुपये देण्यात येतात.

जिल्ह्याचे ३१ मार्च २०२० अखेरचे ४००० एवढे उद्दिष्ट होते, मात्र ७९०० प्रस्ताव विभागास प्राप्त झाले होते. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी ७९०० पैकी पात्र असलेले ७१८८ प्रस्ताव मंजूर केले. बीड जिल्ह्याला यावर्षी चार हजार घरांचे उद्दिष्ट असले तरी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असल्यामुळे स्वतःच्या अधिकाराचा गरजूंसाठी वापर करत त्यांनी सर्व घरकुलांना मंजुरी दिली.

त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात बीड जिल्ह्यात सर्व लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकूल मंजूर करण्यात यावेत, पुढील दोन वर्षात जिल्ह्यात एकही पात्र लाभार्थी शिल्लक राहू नये असे निर्देश मंत्री मुंडे यांनी समाज कल्याण विभागाला दिले असल्याचे सहायक आयुक्त डॉ. मडावी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.