रविकांत तुपकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात नाशिकात पोलिसात तक्रार…
“असल्या तक्रारींना मी भीक घालत नाही”-रविकांत तुपकर..
‘स्वाभिमानी’ व महावितरणमध्ये राज्यात नव्या वादाची सुरूवात…
प्रतिनिधी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्हा दौऱ्यावर असतांना पदाधिकारी मेळाव्यात तसेच प्रसार माध्यमांसमोर बोलताना ‘गावात वीज कापायला आलेल्या कर्मचाऱ्यांना आधी समजावून सांगा आणि नाही ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा’ असे आक्रमक विधान केले होते. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून नाशिकमध्ये तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून राज्यात इतरही ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार असल्याचे विज कर्मचारी संघटनेकडून बोलले जात आहे. यामुळे राज्यात आता महावितरण आणि ‘स्वाभिमानी’ यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
रविकांत तुपकर हे आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्व म्हणून परिचीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुपकर नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात. दरम्यान गेल्या आठवड्यात ते वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि प्रसार माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांबाबत आक्रमक विधान केले होते. थकीत वीजबिलापोटी महावितरण ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करीत आहे, यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत, या विषयीच्या वाढत्या तक्रारी पाहता ‘गावात महावितरणचे कर्मचारी वीज कट करायला आल्यास त्यांना आधी समजावून सांगा आणि नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा’ असे आक्रमक आणि चिथावणीखोर विधान तुपकरांनी केले. इलेक्ट्रानिक मीडिया तसेच सोशल मीडियावर त्यांच्या विधानाचे वृत्त राज्यभर पसरले आणि त्यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. उपनगर पो.स्टे. नाशिकरोड येथे महाराष्ट्र राज्य विज वर्कस फेड्रेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. तुपकरांच्या चितावणीखोर वक्तव्यामुळे काही समाजकंटक महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची दाट शक्यता असल्याने वीज कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारीत नमुद आहे. पोलिसांनी तुर्तास सदर तक्रार चौकशीवर ठेवली आहे. या तक्रारीनंतर आता राज्यात इतर ठिकाणी देखील तुपकरांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी देण्याचे सत्र सुरु होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे रविकांत तुपकर अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महावितरण यांच्यात राज्यात आता नवा वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. हा वाद आता कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तसेच या संदर्भात तुपकरांची बाजू ऐकण्यासाठी गेले असता ते म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण लढत आहोत. आजवर अनेक तक्रारी झाल्या आणि अनेक गुन्हेही आमच्यावर दाखल झाले, त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीला आपण महत्व देत नाही. महावितरणच्या जाचाने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, त्यांच्या भावना पाहता सदरचे विधान केले असून या विधानावर आपण ठाम असल्याचे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे. शेकडो तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले तरी सर्वसामान्यांसाठी आपण लढतच राहणार असल्याचेही तुपकरांनी सांगितले आहे..
