पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात कौतुकास्पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक होते. कारण त्यासाठी कोणतेही मॅन्युअल नव्हते, लेखी आदेश नव्हते, ड्यूटी चार्ट नव्हता.. आपल्या विवेकशक्तीचा वापर करुन प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’ असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय पुणे पोलीस आयुक्तालयातील दलाने दाखवून दिला. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाची पहिली व्यक्ती आढळल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली. पहिला टप्पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्पा 4 मे ते 17 मे 2020 आणि चौथा टप्पा 18 मे ते 31 मे 2020 असा होता.
सर्वसाधारण परिस्थितीत पोलीस दल कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील, यासाठी प्रयत्न करत असते. कोरोनामुळे आलेल्या टाळेबंदीमध्ये मात्र पोलीस दलाला लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, यावर भर द्यावा लागला. पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी या काळात खूपच कौतुकास्पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक होते. कारण त्यासाठी कोणतेही मॅन्युअल नव्हते, लेखी आदेश नव्हते, ड्यूटी चार्ट नव्हता.. आपल्या विवेकशक्तीचा वापर करुन प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.
पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त डॉ. मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त डॉ. पंकज देशमुख, सुहास बावचे, वीरेंद्र मिश्र, स्वप्ना गोरे, पौर्णिमा गायकवाड, शिरीष सरदेशपांडे, संभाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेवून त्यांना दिलासा दिला. टाळेबंदीच्या काळात पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव अनेकांना आला. त्यातील काही प्रसंग, घटनांना माध्यमांनी व्यापक प्रसिध्दी दिली. यापैकीच काही घटना येथे सादर करीत आहे.
मांडवावर वेल- पोलिसांच्या साक्षीने
‘कन्यादानासारखे पुण्य नाही, असे म्हणतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस अधिकारी श्री. घाडगे यांना कन्यादानाचा आनंद मिळाला. एक मूक मुलगी, तिच्या वडिलांचा फोन बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना आला. त्या फोनवर झालेल्या संभाषणातून त्यांना कळालं, की ज्या मूक मुलाशी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे तो औरंगाबादला आहे. पण लॉकडाऊनमुळे त्याला पुण्यात येणं शक्य नव्हतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांनी फक्त ई-पास देऊन त्या मुलाला पुण्यात आणण्याची व्यवस्था केली नाही तर या लग्नात बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्यावतीने ५ जण नवऱ्या मुलाचे पाहुणे म्हणून आणि ५ जण नवरी मुलीकडचे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी छोटासा मांडव घातला, लहान स्टेज बांधले, भटजी सुद्धा बोलावले आणि हा लग्न सोहळा आनंदात पार पाडला.
श्री. घाडगे म्हणाले, मला तर माझ्याच मुलीचे ‘कन्यादान’ करतो आहे असे वाटत होते. ह्या लग्न सोहळ्यानंतर नवविवाहित दांपत्याला औरंगाबादला विना अडथळा पोहोचण्याची सुध्दा व्यवस्था केली. असे हे पोलीसांच्या साक्षीने झालेले लग्न.
खाकीतील ‘देवदूत’
२३ वर्षाच्या एका विवाहितेने विषारी औषध प्राशन केलं. तिला शिवणेतल्या मिनर्व्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिथल्या डॉक्टरांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी तिची माहिती घेतली व हॉस्पिटलला बिल भरत असल्याचे कळवले. परंतु पंधरकरांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलने तिच्यावर मोफत उपचार करून त्याच दिवशी घरीही सोडले. या महिलेच्या पतीशी बोलल्यावर कळले की तो कोथरुडमधील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. परंतु लॉकडाऊनमुळे नोकरी सुटल्याने त्याच्याकडे पेट्रोल काय, रेशन आणायलासुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला नाही. पंधरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्याला काही हजार रुपयांची मदत केली आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने महिन्याभराच्या रेशनची व्यवस्था केली. तसेच त्यांनी मेडिकलच्या मालकाशी बोलून त्याची नोकरी परत मिळवून दिली. त्याची पत्नी पिंपरी-चिंचवडमध्ये कामास होती. परंतु नोकरी गेल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. श्री. पंधरकर यांनी दोघांचे समुपदेशन केले. दोघे पती-पत्नी आता ठीक आहेत आणि पोलीसांचे आभार मानायला पोलिस स्टेशनला येऊनही गेले. खरंच पोलिसांच्या रूपात त्यांना ‘देवदूत’च भेटले.
निराधारांना आधार
सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन निवंगुणे व अश्विनी गोरे या एसपीओच्या मदतीने नऱ्हे इथल्या नवले म्युनिसिपल स्कूलमध्ये २ महिन्यांपासून आश्रय घेतलेल्या ७५ जणांची उत्तम काळजी घेतली.
श्री. शेळके म्हणाले, लॅाकडाऊन जाहीर झाल्यावर आम्ही जेव्हा त्यांना इथे आणले, तेव्हा त्यांचा अवतार खूपच गबाळा होता. केस वाढलेले, दाढी-आंघोळीचा पत्ता नाही. पण या टीमने एसपीओंच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या सर्वांची तात्काळ व्यवस्था केली, त्यांना नवीन कपडे दिले. या सर्व टीमने अगदी समरसून हे काम हाती घेतलं. त्यांना खाऊ-पिऊ घातलं, दाढी-आंघोळ-कपडे इतकंच नाही तर त्यांना मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा पुरवला. यातील काही दारुच्या तर काही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले होते. त्यांचं पुनर्वसनही करण्यात आलं. जेव्हा या निवाऱ्यातून निघायची वेळ आली, तेव्हा कित्येकांचा पाय निघत नव्हता. हीच पावती होती शेळके साहेब आणि त्यांच्या पथकाच्या कामाची !
काळ आला होता पण !
चतु:शृंगी पोलीस स्टेशनचा फोन वाजला. कंट्रोल रूममधून आलेला तो फोन पी. आय. अनिल शेवाळे यांनी घेतला आणि त्यांना कळलं की, कुणीतरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी लगेच बिट मार्शल्स दत्ता गेंजगे, प्रवीण शिंदे, मोबाईल स्टाफचे वन्दू गिरे आणि किशोर शिखरे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले की, बेरोजगार झालेला आणि सलूनमध्ये केशकर्तनाचे काम करणारा जयराम गायकवाड याने खचून जावून कात्रीने स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिथे असणाऱ्या लोकांनी अॅम्बुलन्ससाठी बरेच फोन केले, पण यश आले नाही म्हणून त्यांनी श्री. शेवाळे यांना फोन केला. त्यांनी त्या जखमीला पोलीसांच्या गाडीतून औंधच्या रुग्णालयात नेण्याची सूचना केली. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या टिमने वेळीच हालचाल केली म्हणूनच आज जयराम जिवंत आहे
दोन जीवांची सुटका !
दि. 31 मार्च 2020 ची घटना. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक विद्या राऊत या हवालदार विठ्ठल शिंदे आणि ऑपरेटर जगदीश खेडकर यांच्यासह वन मोबाईल व्हॅनवर कार्यरत होत्या. पुणे-सातारा नवीन हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास बोगद्याच्या थोडं पुढे एक अँब्युलन्स कडेला उभी असलेली त्यांना दिसली. चौकशीअंती कळले की, त्यात 7 महिन्यांची एक गरोदर महिला होती व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बार मध्ये अडकली होती. ही महिला हादऱ्यामुळे खूप घाबरली होती. मोबाईल व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला व तिच्या पतीला धीर देऊन खाली उतरवले. अडकलेली अँब्युलन्स बाहेर काढणे अवघड झाले होते, कारण लॉकडाऊनमुळे रस्त्यावर मदतीसाठी कुणीच नव्हते. एकंदर परिस्थिती पाहता श्रीमती राऊत व कर्मचाऱ्यांनी या महिलेस पतीसह पोलीस व्हॅनमध्ये बसवून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टरांशी बोलल्यावर कळाले की, अँब्युलन्सला बसलेल्या हादऱ्यामुळे ही महिला घाबरली होती व तिचा रक्तदाब कमी झाला होता. तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे पुढचा धोका टळला होता व तिची तब्येत स्थिर झाली होती. पोलीस निरीक्षक विद्या राऊत, शिंदे, खेडकर यांनी कर्तव्यावर असताना दाखवलेल्या माणुसकीमुळे एक नव्हे तर दोन जीव कठीण परिस्थितीतून बाहेर आले.
पोलीस नव्हे, मोठा भाऊ
हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा सचिन चव्हाण हा १९ वर्षांचा सटाण्यातील पिंपळदरा (नाशिक) येथील मुलगा. लॉकडाऊनमुळे एकटा पडला होता. त्यात त्याला किडनी स्टोनचा त्रास. त्यामुळे तो तणावाखाली होता. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. डापसे (८३९५) यांना तो पोलीस स्टेशनजवळ फिरताना आढळला. त्याची विचारपूस करून त्यांनी त्याला धीर दिला. इतकंच नाही तर एका महिन्यापर्यंत त्याच्या जेवणाची व्यवस्था केली आणि दोन महिन्याचे घरभाडेसुद्धा स्वतःच्या पगारातून भरले. त्याचबरोबर त्याची रितसर वैद्यकीय तपासणी करून नाशिकला परत जाण्याची सोय केली.
एका मोठ्या तणावातून सचिन मोकळा झाला. श्री. डापसे यांनी मोठ्या भावासारखी काळजी घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले, तसेच समस्त पोलीस दलाचेही.
आत्ता हरवले, आत्ता सापडले !
पुणे स्टेशनहून बिहारला जाणाऱ्या कामगारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पोलीस नाईक बर्डे आणि ढापसे यांच्यावर होती. नवरा-बायको दोन लहान मुलं व त्यांच्याकडे असणारी एक बॅग असे एक कुटुंब त्यांना स्टेशनकडे येताना दिसलं. ते सर्वांत शेवटी उतरले आणि ते उतरताच बस सुटली. बर्डे सांगत होते, त्यातील महिला रडू लागली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे काही सामान बसमध्येच राहिलं. त्यात मुलाची दुधाची बाटली पण होती. तिला शांत केले आणि आम्ही दोघांनी बस आणि ड्रायव्हरची माहिती काढली. त्यांना असं कळलं की, बस हडपसर डेपोत पोहचली सुध्दा. पण हार न मानता ढापसे आपल्या दुचाकीवरुन वेगाने डेपोत गेले आणि त्या महिलेचे सामान परत मिळवले. तोपर्यंत बर्डे त्या कुटुंबाला धीर देत होते. त्यांनी आपले सामान परत आणलेले पाहताच सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले.
त्या चौघी, पुन्हा आनंदी!
बिबवेवाडीत राहणाऱ्या श्रीमती के. आजोलिऊ लॉकडाऊनच्या एक दिवस आधी सांगवीत
राहणाऱ्या आपल्या
