प्रतिनिधी , मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी सरकार सतत केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने कोविड काळात आखून दिलेली मार्गदर्शक तत्वे आणि त्यावर राज्य सरकारने दिलेला नकारात्मक प्रतिसाद यामुळेही केंद्राची राज्याबाबत नाराजी आहे.
केंद्र सरकारने अनलॉक करत असताना विविध व्यवहार हळुहळू सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने अद्याप मंदिर खुली करणे, शाळा उघडणे अशा निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाही. एवढेच नाही तर मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरळीत करण्याचा प्रस्ताव देखील केंद्राला पाठविला नाही, असे म्हणालेत.
काही दिवसांपुर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईत आले असताना त्यांनी लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारच निरुत्साही असल्याचे सांगितले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
केंद्राने मंजूरी दिलेल्या कृषी विधेयकांची अंमलबजावणीस महाविकास आघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. घटनेनुसार राज्याला केंद्राच्या विरोधात जाता येत नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट येईल, असे आंबेडकर म्हणाले.
