प्रतिनिधी, बीड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन टप्प्यांमध्ये एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. बीड जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढले आहे. आधीच कारखाना ऊस गाळपासाठी घेऊन जात नसल्याने शेतकरी संकटात आहे. असं असताना आता राज्य सरकारने एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिले आहे. शेतकऱ्यांचे पैसे सरकारला वापरता येतील त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला का? असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय. तर वेळीच हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली आहे.
