औरंगाबाद येथे कत्तलीसाठी घेवुन जात होते गायी..
प्रतिनिधी , जळगाव : अवैधरित्या गायी घेऊन जाणारे वाहन पाचोरा पोलिसांनी नगरदेवळा जवळ पकडले असुन सदर वाहना मध्ये चार गायी मिळुन आल्याने वाहन चालकासह एका विरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरदेवळा पोलिस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहिती वरुन शेंदुर्णी येथुन नगरदेवळा मार्गे वाहनाद्वारे औरंगाबादला अवैधरित्या कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दि. ११ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास नगरदेवळा जवळील चुंचाळे गावाजवळ सापळा रचुन सदरचे टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे वाहन (क्रं. एम. एच. २० ए. टी. ७८९८) हे ताडपत्री ने बांधलेल्या अवस्थेत व मागील बाजुस पाट्या लावलेल्या असल्याने सदरचे वाहन थांबवुन यातील चालक शेख इसाक न्हावी शेख युसुफ व त्याचे सोबत असलेला कुरेशी जावेद खलील दोघे रा. शेंदुर्णी ता. जामनेर यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात तोंड व पाय बांधलेल्या जखमी अवस्थेत चार गायी आढळुन आल्या. तसेच त्यांचे जवळ गायींबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने पोलिसांनी तात्काळ वाहनासह आरोपींना ताब्यात घेऊन शेख इसाक न्हावी शेख युसुफ व कुरेशी जावेद खलील यांचे विरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मिळुन आलेल्या गायींना गोशाळेत सोडण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस काॅंन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.
