प्रतिनिधी , बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याची माहिती जाहीर होणं ही चिंताजनकबाब आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी कशी मिळाली? केंद्र सरकारने याबाबत उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. 26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटमध्ये हल्ला झाला. अर्णव गोस्वामी यांना 23 तारखेला ही बातमी कळली. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चारपाच महत्त्वाच्या नेत्यांनाच असते. केंद्रीय मंत्र्यांनाही ही माहिती नसते. मग अर्णव यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे, असं देशमुख म्हणाले.
