प्रतिनिधी, मुंबई : कश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटले होते की नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. कश्मीर फाइल्स मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत, पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील, तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे.पण कश्मीर पंडित सोबत शिखांनी सुद्धा बलिदान केले आहे, सुरक्षा दलातील मुस्लीम पोलिसांना देखील अतिरेक्यांनी मारले आहे आणि कश्मीर पंडित सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते.सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? कश्मीर मधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात? काश्मीर मध्ये सर्वात मोठी गुंतवणूक कधी करणार आहात ? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल.राजकारण होते आणि राजकारण होऊ नये, कश्मीरच्या बाबतीत तरी हे राजकारण होऊ नये, राम मंदिराचा मुद्दा संपला असे आम्ही मानतो, जर काश्मीरचा विषय कोणी काढत असेल तर ते कश्मीर या विषयाला पुन्हा एकदा विषाची उकळी देत आहेत.शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही आणि विसरलेली नाही, हिंदुत्व कोण विसरले याचे आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने करावे, हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे, आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तयार आहोत.
