प्रतिनिधी , पुणे : नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलासह सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. परंतु ऐन फुल तोडणीच्या वेळी मुसळधार पावसाने फुलांचे प्रचंड नुकसान झाले. तर नवरात्रोत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. तसेच बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये खराब फुलांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे फुलांना मागणी कमी आहे. व्यापार्यांनी प्रयत्न करूनही फुलांची विक्री होत नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी हताश होऊन सुमारे 2 ते 3 टेम्पो झेंडूची फुले फेकून दिली.व्यापार्यांनीही शिल्लक राहिलेली फुले फेकून द्यावी लागत आहेत. या प्रकारामुळे फुलबाजारात फेकून दिलेल्या फुलांचा खर्च पडला होता. पावसामुळे फुलांची झाडे प्रचंड प्रमाणात पडली आहेत. तर दुसरीकडे माती लागल्याने फुले खराब झाली आहेत. शेतीतील ६०-७० टक्के फुलांचे नुकसान झाले आहे. फुले भिजल्याने त्याचा दर्जाही खालावला आहे. सणामुळे काहीतरी पैसे मिळतील या आशेने शेतकरी फुले बाजारात आणत आहेत. मात्र फुजलेल्या आणि खराब होण्याच्या स्थितीत असलेल्या फुलांची विक्रीच होत नाही. बाजारात चांगल्या फुलांना फक्त मागणी आहे. परंतु बाजारात चांगल्या फुलांची आवक कमी आहे.झेंडूच्या फुलांना प्रती किलोला 5 ते 10 रूपये दर मिळाला. त्यात थोडी वाढ झाल्याने किलोचा दर 10 ते 20 रूपये होता. कलकत्ता झेंडूच्या फुलांना मात्र प्रती किलोला 20 ते 50 रूपये दर मिळत आहे. बाजारात पुणे जिल्ह्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. पावसामुळे फुले ओली झाली आहेत. त्यामुळे सकाळी विक्रीला आलेली फुले दुपारनंतर खराब होतात.पावसामुळे फुलोत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रविवारी 80 कॅरेटमधून फुले पाठविली होती. त्यातील 20 कॅरेटच्या फुलांची 5 ते 10 रूपयांनी विक्री झाली. बाकी सर्व फुले शिल्लक राहिली. तसेच मिळणार्या दरातून वाहतूकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे उर्वरित फुले गाळ्यावर सोडून गावी परतलो आहे.
