जनतेज न्युज

जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

प्रतिनिधी, धुळे : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार ईडी सारख्या यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास देण्याचे प्रयत्न करीत आहेत. नूकतेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीने समन्स देवून चौकशीला बोलविले आहे. या विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन केले. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार खटला ठेवला गेला. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात डांबण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकारं पाडण्याचे असे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सद्याच्या सरकारची ओळख झाली आहे. विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. हेच चित्र आगामी काळात देशात व  महाराष्ट्रातही दिसू शकेल.  विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधांनकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.