जनतेज न्युज

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल विक्रीत वाढ…राज्यात एका महिन्यात 15 लाख मोबाईल विक्री

प्रतिनिधी , मुंबई : वगळता राज्यात दरमहा सरासरी 7 ते 8 लाख मोबाईल विकले जातात.कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि क्लासेस सुरु झाल्या आहेत.त्यामुळे मेपासूनच मोबाईलची मागणी वाढली होती.जूनमध्ये मुंबई वगळता राज्यात 15 लाख मोबाईलची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते.त्यानंतर हळूहळू सर्व काही सुरु होत गेले.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शाळाही ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु झाले.शाळा जरी ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु झाले तरी पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेसी व्यवस्था न्हवती.मुलांचं शिक्षण तर महत्त्वाचे आहे म्हणून पालकांनी लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये हळूहळू जेव्हा दुकानं सुरु होत गेली तेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करण्यास सुरवात केली.याचा फायदा मोबाईल विक्रेत्यांना झाला असून राज्यात एका महिन्यात सर्वाधिक 15 लाख मोबाईल विक्री झाली आहे.
लॉकडाऊन अगोदर मोबाईल विक्री महिन्याला मुंबई वगळता राज्यात 8 ते 10 लाख मोबाईलची विक्री होत होती.पण लॉकडाऊन नंतर ऑनलाईन शिक्षण जस सुरु झालं तस मोबाईल विक्रीच्या व्यवसायात तेजी येत गेली.जून,जुलै महिन्यात दिड पट व्यवसाय झाला असून महिन्याला 15 लाख मोबाईल मुंबई वगळता राज्यात विकले गेले.पण ऑगस्ट नंतर या व्यवसायात परत घट झाली असून आत्ता पुन्हा मोबाईल दुकानदारांना संघर्ष करावं लागत आहे.ऑनलाईन व्यवसायाचाही मोठ्या प्रमाणात फटका आम्हाला बसला आहे.अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातही एका महिन्यात साधारणता तीन लाखांवर मोबाईलची विक्री झाली आहे.पुणे जिल्ह्यात 4500 मोबाईल विक्रेते असून सर्वाधिक विक्रेते पुणे,पिंपरी-चिंचवड,बारामती या भागातील आहेत.पुणे आणि पिंपरी -चिंचवड परिसरात शाळांची आणि खाजगी क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.लॅपटॉप,कॉम्पुटर विकत घेणे प्रत्येकाला आर्थिकदृष्टया परवडणारे नाही.त्यामुळे मोबाईलच्या मागणीत वाढ झाली आहे.सात ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या मोबाईल खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे.अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमोडे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन शाळा सुरु केल्या.त्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी नवीन मोबाईल घेणे भाग पडले.माझ्या घरात दोन मुले असून मी माझ्या मुलांसाठी एकच नवीन मोबाईल घेतला असून त्यातुन दोन्ही मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला नवीन मोबाईल घ्यावं लागलं.अशी माहिती सोनल कोडरे यांनी दिली.
माझे तिन्ही मुलं शिकत असून एक मुलगा ग्रामीण भागात राहत आहे.त्याच्यासाठी नवीन मोबाईल खरेदी करत आहे अशी माहिती सुरेखा कदम यांनी यावेळी दिली.
लॉकडाऊन नंतर ऑनलाईन शाळा आणि क्लासेस सुरु झाल्याने जून,जुलै महिन्यात मोबाईलच्या विक्रीत वाढ झालेली असली तरी त्यानंतर मोबाईल विक्रीत 40 टक्क्यांनी घट झाली आहे.जूनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल विक्री झाली मात्र त्यानंतर साधारण 60 ते 70 हजार मोबाईल संपूर्ण पुणे जिल्ह्यात विकले जात आहे.जिल्ह्याप्रमाणेच राज्याची जून,जुलै नंतर तीच परिस्थिती असून आता मोबाईल विक्रेत्यांना पून्हा एकदा संघर्ष करावा लागत आहे.