भाताचे कोठार असलेल्या कोकणाला भाताची आयात करण्याची नामुष्की ओढवणार, शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
प्रतिनिधी , कोकण : कोकणाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, मात्र आज मितीस कोकणातील शेतकरी निसर्गाच्या लहरी पणामुळे पुरता उध्वस्त झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती, वादळे, अतिवृष्टीने कोकणच्या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. एकेकाळी कोकणातून भात निर्यात केला जाई,मात्र आता भात आयात करण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करतोय. गुलाब चक्रीवादळाचा फटका रायगड सह कोकणातील शेतकऱ्यांना बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून गळून पडला आहे. ठिकठिकाणी भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुधागडातील शेतकऱ्यांच्या भातपिकांची नासाडी झाली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, याचाही मायबाप सरकारने विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ, फयान वादळ, अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला, सलग दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे, भात पीक, घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले, या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले. पेरणी व कापणीचा खर्च ही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. जगावे की मरावे या द्विधामनःस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला शासन मदतीची अपेक्षा आहे. या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे,
