सरकार नापास झाल्याचा केला आरोप
विवेक ताम्हणकर
प्रतिनिधी ,सिंधुदुर्ग – चिपी विमानतळाच्या बाबतीत सत्ताधारी फक्त वल्गना करताहेत. मात्र हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्राथमिक गोष्टी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. रस्ता, पाणी, वीज, इंटरनेट या सुविधा आजही इथे पोचलेल्या नाहीत. अस असताना केवळ श्रेयाच राजकारण पालकमंत्री, खासदार, आमदार करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर नापास झाल्याने जिल्ह्यात 70 पैकी 60 ग्रामपंचायती भाजपकडे येतील असा दावा त्यांनी यावेळी केला.
विमानतळावर पोचायला आजही रस्ता चांगला नाही
सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नारायण राणे यांच्या प्रयत्नाने घोषित झाला आहे. त्याकरता विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. मात्र आजही याठिकाणी विमानतळ अत्यंत सुंदर झालेले असताना त्या ठिकाणी पोचायला रस्ता चांगला नाही, पाण्याची सोय नाही अशी स्थिती आहे. राज्यातील अनेक विमानतळ प्राथमिक सुविधा नसल्याने बंद झाले आहेत. या गोष्टी राज्य सरकारच्या हातातील आहेत. त्या पूर्ण करायला सरकारचे कोणी हात बांधले होते का असा प्रश्नही राजन तेली यांनी विचारला. नारायण राणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना केल्या असून विमानतळ कंपनीचे मालक म्हैसकर यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे. संबधित सुविधांसाठी आवश्यक रक्कम आपण संबधित विभागाकडे जमा करा अशी सूचनाही त्यांना केल्याचे तेली म्हणाले.
बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील याची खात्री नाही
विमानतळ कर्मचारी भरतीसाठी सत्ताधाऱ्यानि बेरोजगारांचे फॉर्म भरून घेतले आहेत. मात्र धूळ खात पडलेले हे फॉर्म बाहेर येऊन या लोकांना नोकऱ्या मिळतील याची खात्री नाही असेही तेली म्हणाले. नारायण राणे, सुरेश प्रभू दिल्लीत खासदार आहेत. विमनोड्डाण मंत्रीही भाजपचे आहेत त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा यांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करा आणि विमानतळ कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.
मच्छीमाराना आजही पॅकेजचा लाभ मिळाला नाही
मासेमारी व्यवसायबाबत फडणवीस सरकारच्या काळात पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र या सरकारने कुटुंबातल्या एकालाच लाभ मिळण्याची अट घालून येथील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांची फसवणूक केली आहे. मात्र आमदार,खाससार, पालकमंत्री एकमेकांच्या सत्कारात गुंतले असल्याचा आरोपही राजन तेली यांनी केला.
चक्री वादळाच्या मदतीचे पैसे अजून आलेले नाहीत
चक्री वादळाच्या मदतीचे पैसे आजही आलेले नाहीत. लोकांची फसवणूक या लोकांनी केली आहे. मेडिकल कॉलेज बाबत आवई उठविली जाते. कॉलेज करा मात्र त्याआधी कुडाळच्या महिला हॉस्पिटलचे काम पूर्ण करा असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील 70 पैकी 60 हुन अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
