प्रतिनिधी , ठाणे : कोर्टातही कामगारांची बाजू मांडली गेली नाही.. प्रकाश आंबेडकर यांची ठाण्यात टोलेबाजी.
या सरकारने एसटी कामागरांचे शोषणच केले आहे. शरद पवार हे सत्तेत नाही तर शरद पवार यांचा पक्ष सत्तेत आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात लगावला आहे.कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून याचा आम्ही निषेधच करतो मात्र एसटी कामगारांची कोर्टात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही, कोर्टाने एक संधी दिली आहे कामावर रुजू होण्याची , त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना यावेळी केली.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते . प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता .मात्र तेव्हाच भूमिका आम्ही मांडली होती की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता कोर्टाने संधी दिली आहे, उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजू होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खाजगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता, मात्र संपबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर जेवढं अभय कोर्टाने दिलं आहे आणखी अभय दिले असते असे आंबेडकर म्हणाले.
सदावर्ते यांच्यावरही केली टीका..
वकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते, नेते आणि वकील आशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर उत्तर देणार…
हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे त्याचारून उद्या राज ठाकरे यांच्या सभेनंतरच आपण उत्तर देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
बेरोजगार आणि महागाईचे मुद्दे लपवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत …
मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती.पेट्रोल डिझेलचे दरही 80 रुपयांच्या वर गेले नव्हते.मात्र आजच्या घडीला महागाई बोकाळली असून त्यामुळेच हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचे आमचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले .
