प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मनसे आमदार राजू पाटील आज डोंबिवली पूर्वेकडील देशमुख हाऊस येथील पाणी समस्येबाबत केडीएमसी मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंत्याची भेट घेत पाणी पुरवठ्याबाबत चर्चा केली . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही समस्या निकालात निघेल असं स्पष्ट केलं. यावेळी आयुक्तांना का भेटले नाही, या प्रश्नावर उत्तर देताना आमदार राजू पाटील यांनी सांगितले की आयुक्तांना आजमितीला शंभर पत्रं पाठवली. मात्र आयुक्त हे पत्र संबंधित विभागाला पाठवतात तेथून काही उत्तरच येत नाही. त्यामूळे आयुक्तांकडे न जाता थेट संबंधित विभागात आपण गेलो. आतापर्यंत आयुक्तांकडे घेऊन गेलेलो एकही काही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार असा टोमणा यावेळी लगावला. आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता याची आता जोरदार चर्चा केडीएमसी आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
