प्रतिनिधी , पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून एका वकिलाचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात तीन आरोपी आहेत, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बालाजी नगर येथे राहणारे उमेश चंद्रकांत मोरे शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून १ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले.
उमेश यांचा ताम्हीणी घाटात खून झाल्याची माहिती खबऱ्यांने दिली. उमेश यांचे शव घाटात जळालेल्या अवस्थेत आढळले. या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी मेष यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. जमिनीच्या वादातून खून केल्याचे सांगितले.
