प्रतिनिधी , मुंबई : कृषी कायद्याला विरोध करण्याऱ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे,असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.जे वातावरण दिल्लीच्या सीमेवर दिसतंय, 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही, त्यांना केंद्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही.त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जातीय,असंही ते म्हणाले.
याचबरोबर दुसरीकडे विरोधीपक्ष विस्कळीत आहे. जिथे विरोधी पक्षाची सत्ता आहे तिथे केंद्राच्या दबावाखाली, दहशतीखाली काम करू दिलं जात नाही.महाराष्ट्रात मेट्रोसारखे प्रकल्प होऊ नये यासाठी यंत्रणा काम करतीये.पश्चिम बंगाल मध्ये वेगळं राजकारण सुरू आहे.जो विरोधी पक्षात आहे त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात मजबूत संघटन तयार करणे गरजेचे आहे,असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.
तसेच सध्या युपीए आहे. युपीएमध्ये सोनिया गांधींकडे नेतृत्व आहे. मात्र,आता युपीएची ताकद वाढणे गरजेचं आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी,पक्षांनी एकत्र येऊन सरकारची जी तानाशाही सुरू आहे, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे,असे खासदार संजय राऊत म्हणाले.
