प्रतिनिधी , ठाणे : सत्ताधारी शिवसेना अजान प्रेमात पडली असताना ठाणे भाजपाने आयोजित केलेला गीतापठन व वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम कौतूकास्पद आहे, असा टोला भाजपाचे ठाणे प्रभारी व आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. एकीकडे शिवसेनेची अजान स्पर्धा, तर दुसरीकडे भाजपने घेतलेली गीतापठण व वंदेमातरम गायन स्पर्धा यातून राष्ट्रभक्ती कोण करीत असल्याचे ठाणेकरांना स्पष्ट होत आहे, असे श्री.शेलार यांनी सांगितले.
दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि गीता जयंती असा दुहेरी योग जुळून आल्याबद्दल भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने सहयोग मंदिरात गीता पठण व बुद्धीजिवी प्रकोष्ठच्या वतीने वंदेमातरम गायन स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार शेलार बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदिप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी आदी उपस्थित होते.
हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली. संतुलीत जीवन जगण्याबरोबरच कर्तव्य व भावना यांची सांगड भगवद्गगीतेत घातली आहे. त्यासाठी गीतापठण महत्वाचे आहे. तर राष्ट्रभावना जागृत राहण्यासाठी वंदेमातरम गायन गरजेचे आहे, असे मत श्री. शेलार यांनी व्यक्त केले. शिवसेना अजान स्पर्धा आयोजित करते. तर भाजपाने राष्ट्रप्रेमासाठी वंदे मातरम व भगवद्गगीता पठण स्पर्धा घेतल्या. यात राष्ट्रभक्तीच्या दृष्टिने एक पाऊल पुढे कोणत्या पक्षाचे आहे, ते ठाणेकरांना कळत आहे. त्यातून तरी शिवसेनेने बोध घ्यावा, असा टोलाही श्री. शेलार यांनी लगावला.
या वेळी जगद्गुरु शंकराचार्यांच्या शृंगेरी मठातील भगवद्गगीता पठनात २१ हजारांचे बक्षीस मिळविलेल्या ४५ जणांकडून गीता पठण करण्यात आले. तर वंदेमातरम गायन स्पर्धेत वैयक्तिक नागरिकांबरोबरच सामुहिकरित्या वंदेमातरम गायन पार पडले. या दोन्ही स्पर्धांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणेकरांनी पसंती दर्शविली.
दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातही उपस्थित राहून रक्तदात्यांचे आभार मानले. या ठिकाणी रक्तदान करणाऱ्या रिक्षाचालक-मालकांना शर्ट-पॅन्टपीस देण्यात आला. तसेच डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक सुनेश जोशी व मृणाल पेंडसे यांच्या निधीतून प्रशांतनगर येथे उभारलेला क्षणभर विश्रांती कट्टा व विष्णूनगर येथे उभारलेल्या मैत्री कट्ट्याचे उद्घाटनही श्री. शेलार यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर अटलजी वाजपेयींच्या जयंतीनिमित्ताने रमेश आंब्रे यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या सांगितीक मानवंदना कार्यक्रमालाही आशिष शेलारांची उपस्थिती होती.
