प्रतिनिधी, कल्याण : गेल्या वर्षभरापासून कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा प्रश्न सोडवण्यासाठी ओला सुका कचरा वर्गीकरण , कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प अशा विविध उपाययोजना सुरू केल्या होत्या. मात्र गेले दीड ते दोन महिन्यांपासून या सगळ्या उपाययोजनांना खो बसल्याचे शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढीगांवरून दिसून येतेय. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत असल्याने शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले तर आहेच त्याच बरोबर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असताना कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.
आरंभशूर अशी ख्याती असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेसमोर पुन्हा एकदा कचरा प्रश्न उभा ठाकल्याचे दिसून येत आहे.अस्वच्छ शहर असा शिक्का बसलेल्या कल्याण डोंबिवली शहरात कचरा प्रश्न आ वासून उभा ठाकला होता. कचरा प्रश्न मार्गी लावण्पालिका प्रशासनाने कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कचर्यावर प्रक्रिया करणारे उंबर्डे आणि बारावे प्लांट सुरु केला, मोठ्या सोसायट्या आणि संकुलात कचरा प्रक्रिया प्लांट उभारन्याबाबत जनजागृती करणे, प्लास्टिक बंदीची अमलबजावणी आदी उपायोजना सुरू केल्या. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामदास कोकरे यांनी पुढाकार घेत या योजना राबवल्या होत्या. महिनाभरापूर्वी रामदास कोकरे यांची बदली झाली आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच झाल्याचे दिसून येते. कर्मचार्याना कचरा प्रश्न सोडविण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळे शहरातील कचरा प्रश्न पुन्हा उफाळून आलाय .शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेत, घंटा गाड्यांचे नियोजन नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न उभा ठाकल्याचे दिसून येत आहे.
