प्रतिनिधी , सोलापूर : लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यपूर्वकाळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती होय.
या गणपतीने १३९ वर्ष पूर्ण केले आहेत.आज मोठ्या भक्तीमय वातावरणात या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लोकमान्य टिळक १८८५ मध्ये सोलापूरला आले होते.लोकमान्य टिळक यांची सोलापूरची महानगरपालिका असलेली ‘इंद्रभुवन’ ही देखणी वस्तू निर्माण करणारे कै.अप्पासाहेब वारद यांची घनिष्ठ मैत्री होती.लोकमान्य टिळक सोलापूरला आल्यावर त्यांचे वास्तव्य आप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असे..जुन्या फौजदार चावडी जवळ श्रद्धानंद समाजाचे सदस्य कै.पसारे यांच्या घरी पानसुपारी कार्यक्रमासाठी अप्पासाहेब वारद यांनी लोकमान्य टिळक यांना बरोबर नेले,शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती आणि गणेश उत्सव समारंभात पानसुपारी कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येते.सोलापुरातील आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन त्यानंतर १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते.त्याप्रमाणेच आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता वाढवणारे कार्यक्रम हे मंडळ राबवित आहे.कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात बाप्पांच्या उत्सवामध्ये खंड पडला होता,मात्र, यंदा उरलीसुरली सर्व कसर भरून काढण्याचा निर्धार मंडळाने घेतला आहे.आणि अगदी तशाच प्रकारचा उत्साह गणेश भाविकांमध्ये ही दिसून येत आहे.
